त्र्यंबकेश्वर :ब्रह्मगिरी परिक्रमा मार्गावरील पहिणे फाटा येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने पावसामुळे निर्माण झालेला चिखल व रस्त्याची झालेली दुरवस्था याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर व तालुका उपाध्यक्ष विशाल माळी यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.पवित्र श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी परिक्रमा करण्यासाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. पहिणे फाटा परिसरातील रस्ता चिखलमय झाल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे अथवा काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर खडीकरण करून वाहतूक व भाविकांची परिक्रमा सुरळीत करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या मागणीची त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार यांनी तत्परतेने दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही तातडीने हालचाली करून सदरील काम मार्गी लावल्याने स्थानिक गावकऱ्यांसह ब्रह्मगिरी परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.भाजपने केलेल्या मागणीची प्रशासनाने तत्परतेने दखल घेत प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर आणि तालुका उपाध्यक्ष विशाल माळी यांनी प्रशासनाचे आभार मानले.
