वेलनेस सेंटरच्या माध्यमातून सुदृढ, ऊर्जावान आणि समाजाभिमुख तरुण पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे ठाम प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेतील सेवावृत्त प्राध्यापक प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले.अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे सामाजिक जाणिवेतून उभारण्यात आलेल्या एस पी वेलनेस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजकार्याची आवड, धार्मिक आचरण आणि आरोग्याबाबत जागरूकता या त्रिसूत्रीवर आधारित हा आगळा-वेगळा उपक्रम श्री. शहेबाज पठाण व त्यांचे सुपुत्र कु. आदिल पठाण या पिता–पुत्रांनी सुरू केला असून, त्यांच्या कार्याचे प्रा. बनसोडे यांनी विशेष कौतुक केले.प्रा. बनसोडे पुढे म्हणाले की, नियमित व्यायामामुळे निर्माण होणारी शारीरिक ऊर्जा ही संघर्षासाठी नव्हे तर समाजकार्यासाठी वापरली गेली, तर खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा घडू शकते. आजच्या तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून या वेलनेस सेंटरचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
“एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे आचरण केल्यास एस पी वेलनेस सेंटरचे नाव केवळ राहुरी फॅक्टरीपुरते न राहता संपूर्ण तालुक्यात नावलौकिक मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या वेलनेस सेंटरचे उद्घाटन प्रहार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. अप्पासाहेब ढुस यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही अप्पासाहेब ढुस हेच होते.कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चोळके, अप्पासाहेब कोहकडे, ललित चोरडिया, पवार साहेब, मदिना शेख यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आदिल पठाण यांनी प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार जालिंदर आल्हट, किशोर थोरात, बाबाखान पठाण, मदिना शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर थोरात यांनी केले, तर शेवटी शहेबाज पठाण यांनी आभार मानले. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.
