भारतीय प्रजासत्ताकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा अधिष्ठान देणारे, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर विचारांचे पुनरुज्जीवन करण्याचा क्षण आहे. सामाजिक समतेच्या आणि मानवी मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या महामानवाने भारताच्या वाटचालीला नवे दिशा-दिग्दर्शन दिले.—
दलित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे खरे उद्धारक: महात्मा गांधींना महात्मा, टिळकांना लोकमान्य ही उपाधी जशी प्राप्त झाली, तशीच उपेक्षित समाजाला माणुसकी, न्याय, समता आणि अधिकार मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो-कोटोंच्या हृदयात खऱ्या अर्थाने देवपदावर आरूढ झाले. समाजातील जात, पंथ, प्रांत यांची दरी मिटवून ‘भारतीय’ ही एकसंध ओळख निर्माण करण्याचे, जातीय सलोखा प्रस्थापित करण्याचे महान कार्य त्यांनी केले.—
हलाखीच्या परिस्थितीतून ज्ञानशिखराकडे वाटचाल :14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे जन्मलेल्या भीमरावांनी 18-18 तास अभ्यास करून ज्ञान संपादन केले. अस्पृश्यांवर होणारा अत्याचार, तुच्छतेची वागणूक आणि सामाजिक अन्याय यांनी त्यांच्या मनाला चटका दिला आणि याच अन्यायाविरुद्ध त्यांनी समतेचा रणसंग्राम छेडला.ऐतिहासिक सत्याग्रह1927 – चवदार तळे सत्याग्रह : ‘पाणी’ या मूलभूत हक्कासाठी लढानाशिक – काळाराम मंदिर सत्याग्रह : मंदिर प्रवेशाचा हक्कया लढ्यांनी भारतातील सामाजिक क्रांतीला नवे वळण दिले. हजारो वर्षे अंधारात गडप झालेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला.—
बुद्धापासून फुले-शाहू ते आंबेडकर… आणि लढा अजूनही सुरूच: समतेचा लढा गौतम बुद्धांपासून सुरू होऊन फुले आणि शाहू महाराजांच्या मार्गाने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वात अधिक प्रखर झाला. तरीही जातीय प्रथांचे अवशेष समाजात आजही दिसून येतात. समतेचे खरे समाजव्यवस्थेचे स्वप्न अद्याप अधुरेच आहे.—
भारतीय घटनेचा शिल्पकार;प्रतिनिधित्वाची ऐतिहासिक निवड: स्वातंत्र्यानंतर भारताची घटना तयार करण्यासाठी तयार केलेल्या घटना समितीत डॉ. आंबेडकर यांची निवड हा इतिहासातील महत्त्वपूर्ण क्षण.बंगाल विधी मंडळातील ‘खुलना’ मतदारसंघातून दलित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली. मुस्लिम लीगनेही या निवडीला पाठींबा दिला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा हक्क दिला — जात, धर्म, वंश, पंथ, किंवा प्रदेश कोणताही असो.—
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आजची गरज: आजही समाजात विषमता, अन्याय, असमानता दिसून येतात. म्हणूनच त्यांच्या विचारांना व आचारांना अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.डॉ. आंबेडकरांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे विचार व मूल्ये प्रत्यक्ष आयुष्यात आणणे — समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाज उभारणे.—
लेखक परिचय- सेवानिवृत्त शिक्षक श्री. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे (साकुरी, ता. राहाता मो. 9604797316)
