राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी 1 ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर बसस्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिकांसह ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर प्रवासी मोठ्या संख्येने अर्ज करण्यासाठी बसस्थानकात दाखल होत आहेत.महिलांना 50 टक्के प्रवास सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत, विद्यार्थ्यांचे पास तसेच एसटीच्या विविध सवलतींचा लाभ या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळणार असल्याने नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.हे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ₹200 शुल्क आकारले जात असून, अर्जासोबत आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी त्र्यंबकेश्वर बसस्थानकात स्वतंत्र एसटी काउंटर सुरू करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार रक्कम भरून (रिचार्ज करून) प्रवास करता येणार असल्याने ही व्यवस्था अधिक सुलभ आणि डिजिटल स्वरूपाची ठरणार आहे. आगामी काळात सर्व सवलतींचा लाभ या कार्डाद्वारेच मिळणार असल्याने नागरिकांनी वेळेत स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
