नाशिक तालुक्यातील महिरावणी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. ५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.मृत विद्यार्थ्याचे नाव जालीधर वामन टोपले (वय १६, रा. राजेवाडी, ता. जि. नाशिक) असे असून तो महिरावणी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत होता.प्राथमिक माहितीनुसार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास आश्रमशाळेत असताना जालीधर याला अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळेचे अधीक्षक चव्हाण आणि विद्यार्थ्याचे वडील वामन टोपले यांनी त्याला रात्री सुमारे ११.४५ वाजता उपचारासाठी CHN रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ वाजता डॉ. मृणाली किरवे यांनी तपासणी करून जालीधर याला मृत घोषित केले. त्यानंतर प्राप्त झालेल्या अकस्मात मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे करीत असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आणि तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
